BANNER

The Janshakti News

२०१९ च्या महापुराच्या अनुदानासाठी मनसेचे पलूस तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण



कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषीवरती कारवाई करा अशी केली मागणी






=====================================
=====================================

पलूस | दि. २८ एप्रिल २०२३

२०१९ ला आलेल्या महापुराच्या अनुदान वाटपामध्ये भोंगळ कारभार झाला असून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करावी आणि चुकीचे पंचनामे करणाऱ्या व भ्रष्ट मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी पलूस तालुक्यातील मौजे ब्रह्मणाळ गावातील पूरग्रस्त महिला पुरुष बांधवांनी शेतकरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

चुकीचे पंचनामे करून चुकीच्या लाभार्थींना कोट्यावधी रुपयांचे वाटप झाले असल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी केलेले चुकीचे पंचनामे सादर करण्यात आले. सदर पंचनाम्यावरती अनेक ठिकाणी साक्षीदारांच्या, ग्रामसेवकांच्या सह्या नाहीत मयत व्यक्तींच्या कुटुंबातील तीन तीन चार चार जणांना ९५ हजार १०० रुपयाचा लाभ देण्यात आला आहे. नदीपासून अवघ्या ५० फुटावर असलेल्या मौजे ब्रम्हनाळ गावातील १) आण्णासो शिवगोंडा पाटील. २) महावीर सुरगोंडा पाटील.३) जयपाल भाऊसो अष्टेकर.४) मालती श्रीधर पाटील. ५) जयपाल देवगोंडा पाटील.
६)सुधीर भूपाल पाटील. ७) रावसो शामगोंडा पाटील. ८) राजगोंडा दादा पाटील.(९) बापू भाऊ अष्टेकर. (१०) क्रांतीकुमार जनगोंडा पाटील.(११) महावीर बाबू पाटील.१२) तात्यासो आप्पा पाटील.१३) बाळगोंडा आप्पा पाटील.१४) राजगोंडा रामगोंडा पाटील.
१५) दादासो आप्पा पाटील.१६) अशोक भूपाल राजोबा या १६ कुटुंबांना लाभ मिळाला नाही. त्यांच्याकडून एजंटांना अधिकाऱ्यांना ठराविक रक्कम दिली गेली नसल्यानेच त्यांना ९५ हजार १०० रुपये या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यावेळी असणाऱ्या ग्रामसेवक तलाठी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी असे अनेकांनी चुकीचे पंचनामे करून स्वतः काही रक्कम घेऊन चुकीच्या लाभार्थ्यांना ९५ हजार १०० रुपये दिलेले आहेत. यामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. अशा संबंधित अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


शेतकरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले यावेळी तालुकाध्यक्ष सागर सुतार ,जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, दिलीप निकम ,आर डी पाटील, राहुल हजारे, प्रमोद पाटील, क्रांतीकुमार पाटील, संग्राम थोरबोले, बंडोपंत अर्बुणे यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन स्थळी गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी भेट दिली . यावेळी आंदोलनकर्त्यांनी सगळे झालेले पंचनामे संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर सादर केले. चुकीचे पंचनामे झाले असून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे काम काही एजंट, गाव पुढारी व अधिकारी यांनी केले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी व्हावी व दोषीवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असे अंकुश पाटील म्हणाले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆