BANNER

The Janshakti News

एफ आर पी बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.... वसगडे येथे ऊस वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर अडविले...



एफ आर पी बाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक....

वसगडे येथे ऊस वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर अडविले...

वसगडे | दि. ३१/१०/२०२१

सांगली जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी होणारी साखर कारखानदारांची बैठक न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन, वसगडे येथे सोनहिरा कारखान्याचे ७ ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर रोखून धरले. साखर कारखानदारांनी लवकरात लवकर एफ आर पी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर  स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही अधिक आक्रमक पावित्रा घेऊन, रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संदिप राजोबा यांनी दिला आहे.


 आज कोणत्याही परिस्थितीमध्ये सोनहिरा साखर कारखाना दर जाहीर करणार म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  थोडेसे दुर्लक्ष केले होते परंतु एक वाजेपर्यंत बैठकीचा काही मागमूस लागला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत वसगडे येथे ऊस वाहतूक रोखून धरली होती.यामुळे शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु 



कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत कणसे हे स्वतः  वसगडे येथे चर्चेसाठी आले व त्यांनी वाहने सोडण्यास विनंती केली. त्यावेळी संदीप राजोबा यांनी तीस तारखेला बैठक घेऊन दराची कोंडी फोडणार होता त्याचं काय झालं ? ते प्रथम सांगा. वसंतदादा कारखान्याला जमते ?  मग इतरांना का जमत नाही ? अशी विचारणा केली असता, शेती अधिकारी प्रशांत कणसे म्हणाले की, कारखान्याचे एम.डी.साहेब पुण्याला गेले आहेत.त्यामुळे आज बैठक झाली नसल्याचे,  तसेच येत्या  सोमवारी बैठक होणार आहे असे प्रशासनाशी चर्चा करून सांगितले.
 
तसेच आज तुटलेला ऊस घेऊन जातो अशी मागणी केली.यावेळी संदिप राजोबा यांनी आधी दराचे बोला, मग वाहने सोडतो अशी भूमिका घेतली.यानंतर संदिप राजोबा, शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणून तुटलेला ऊस जाऊ दे,तसेच एकरकमी एफ आर पी चा निर्णय होईपर्यंत  तोडी बंद ठेवा अशी भूमिका घेतली. 


यावेळी सर्वानुमते ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व चालू असलेल्या ऊस तोडी तात्काळ बंद ठेवण्याबाबत कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले. यावेळी सोनहिरा कारखान्याचे शेती अधिकारी प्रशांत कणसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष धन्यकुमार पाटील, गटविकास अधिकारी हेमंत सूर्यवंशी, सनित कदम, मुकेश चिंचवडे, राजाराम चौगुले, विलास पाटील बनाटे, शशिकांत बनाटे, सदाशिव बेनाडे, कृष्णा पाटील, संजय गावडे,  गणेश गावडे यांच्यासह पोलीस प्रशासन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.