BANNER

The Janshakti News

बोगस अनुदान लाटणारे व त्यांना मदत करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी व त्यांच्याकडून रक्कम वसूल करून ती खरे पूरग्रस्त व व्यापारी यांना द्यावी.... भिलवडी येथील वंचित पूरग्रस्तांची मागणी



बोगस अनुदान लाटणारे व त्यांना मदत करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी व त्यांच्याकडून रक्कम वसूल करून ती खरे पूरग्रस्त व व्यापारी यांना द्यावी....

   भिलवडी येथील वंचित पूरग्रस्तांची मागणी..

येणाऱ्या दहा दिवसांत प्रशासनाने योग्य ती
 कारवाई करुन वंचित पूरग्रस्तांना न्याय नाही दिल्यास... जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिलवडी येथील  वंचित पूरग्रस्त  आंदोलनासह  करणार बेमुदत आमरण उपोषण....




भिलवडी | दि.22/10/2021

२०२१ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापुरात भिलवडी गावातील व्यापारी व पूरग्रस्तांचे मोठे नुकसान झाले.पण शासनाकडून मिळणारी मदत खऱ्या नुकसानग्रस्तांना न मिळता बोगस व्यापारी व पूरग्रस्तांनी लाटली आहे.प्रशासनाने या घोटाळ्याची सखोल चौकशी करून बोगस अनुदान लाटणाऱ्यावर व त्यांना मदत करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन  भिलवडी येथील पूरग्रस्तांनी  गुरुवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सांगली  जिल्हाधिकाऱ्यांना दिले.उपजिल्हाधिकारी 
मोसमी बर्डे यांनी या निवेदनाचा स्वीकार केला.प्रशासन या निवेदनाची योग्य ती दखल घेवून कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले.
या निवेदनावर रमेश पाटील,माजी सरपंच विजयकुमार चोपडे,तानाजी भोई, मुनीरखाॅं पठाण,मन्सूर मुल्ला,किशोर तावदर,निलेश माळी, प्रविण मुळे,सुहास वावरे आदीं सह नागरिकांच्या सह्या आहेत.गावातील काही स्वयंघोषित नेते मंडळी,ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी,अधिकारी वर्ग व एका संस्थेतील काही कर्मचारी यांनी संगनमताने एकत्रित येऊन हा घोटाळा केला आहे.

ज्यांची घरे आर. सी.सी.असून ती पडली नाहीत,जे लोक भिलवडी गावात राहत नाहीत
त्यांच्या बँक खात्यावर पूर्णपणे घरपडझडीचे प्रत्येकी एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

ज्यांनी कधीच कोणता व्यापार केला नाही किंवा दुकान,साधी पानाची टपरीही नाही अशा बोगस व्यापाऱ्यांनी एकाच कुटुंबातील विविध सदस्यांच्या नावे कमीत कमी एक ते चार चार दुकानांच्या नुकसान भरपाईचा लाभ उठविला आहे.

यामुळे ज्यांची घरे पडली आहेत असे  नागरिक व मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले छोटे,मोठे,व्यापारी वर्ग अनुदानापासून वंचित आहेत.

सांगली जिल्हा प्रशासनाने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करून सदर घोटाळ्याची चौकशी करावी, बोगस अनुदान 
लाटणारे व त्यांना मदत करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी,त्यांच्याकडून रक्कम वसूल करून ती खरे पूरग्रस्त व व्यापारी यांना द्यावी.

येत्या दहा दिवसांत वंचित पूरग्रस्तांना न्याय न मिळाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालया समोर  उपोषणासह तीव्र आंदोलनाचा इशारा भिलवडी येथील वंचित पूरग्रस्त नागरिकांनी दिला आहे. 


उपजिल्हाधिकरी मोसमी बर्डे यांना निवेदन देताना रमेश पाटील,तानाजी भोई, मुनीरखाॅं पठाण,किशोर तावदर...