BANNER

The Janshakti News

पूरग्रस्तांच्या शासकीय अनुदानामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची व बोगस पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची पंचायत राज समिती प्रमुख यांच्याकडून चौकशी व्हावी... रोहित नलवडे..



पूरग्रस्तांच्या शासकीय अनुदानामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची व बोगस पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची पंचायत राज समिती प्रमुख यांच्याकडून चौकशी व्हावी...

रोहित नलवडे..

मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार वि.स.स.तथा समिती प्रमुख, लोकलेखा समिती यांची विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन दिले लेखी पत्र...

पलूस | दि. 22/10/2021

जुलै 2021 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या महापूरामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील १८ गावाना महापुराचा फार मोठा तडाखा बसला होता. कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे व महापूरामुळे कृष्णा काठचा शेतकरी , व्यवसायिक , व्यापारी , छोटे मोठे दुकानदार , गोरगरीब मजूर व सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला असताना सत्तेचा गैरवापर करुन गावगाडा चालविणारे पुढारी , ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून अनेक नुकसानग्रस्त पूरबाधित नागरिकांना मदतीपासून वंचित ठेवून आपल्याच घरातील लोकांना व आपल्या जवळच्या लोकांना तोंडं बघून शासनाची मदत मिळवून देऊन शासनाची फसवणूक केली आहे. ज्यांची घरे व दुकाने पाण्याखाली गेली नाहीत ज्यांचा महापूराशी कसलाही संबंध नाही अशा लोकांची नावे पंचनामा केलेल्या यादीमध्ये घातलेली आहेत व अशा लोकांच्या बँक खात्यात मोठमोठ्या रक्कमा देखील जमा झालेल्या आहेत. महापूरामुळे ज्यांच्या घरांचे खरोखर मोठे नुकसान झाले आहे अशा पूरग्रस्त नागरिकांना तुटपुंजी मदत आणि ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही व जे लोक बंगल्यात राहतात त्यांना मात्र घरपडझडीचे 1,50,000 रु. असे प्रकार देखील झाले आहेत.पुढारी तुपाशी आणि व्यापारी व गरीब कुटुंब उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत मधील सदस्यांनी नातेसंबंध असणाऱ्या लोकांची दुकाने असल्याचे दाखवून खरापूरग्रस्त व्यापारी यांना मिळणारी मदत बोगस व्यापाऱ्यांना देऊन फार मोठे पाप करण्याचे काम सुरु केले आहे . ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाने केलेल्या पंचनामा केलेल्या यादीमध्ये बदल करुन बोगस नावे दाखवून शासनाची दिशाभूल केली आहे. आणि ज्या व्यापाऱ्यांचे अतिशय मोठे नुकसान झाले आहेे अशा व्यापाऱ्यांचा नुकसानीचा कमी दर्जा दाखविलेला आहे . आणि ज्यांचे दुकानांशी काही संबंध नसताना त्यांना ५० हजार रुपये दिले आहेत व ज्याचे जास्त नुकसान झाले आहे अशा लोकांना तोंडं बघून १० हजार , २० हजार , २५ हजार रक्कम मंजूर केली आहे.


रोहित नलवडे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सांगली ग्रामीण सरचिटणीस यांनी मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना विधान भवन मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून पलूस तालुक्यातील पूरग्रस्तांच्या समस्येवर सखोल चर्चा केली व पलूस तालुक्यात पूरग्रस्तांच्या शासकीय अनुदानामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची व बोगस पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची पंचायत राज समिती प्रमुख यांच्याकडून चौकशी बाबत शिफारश करावी असे लेखी पत्र दिले.


रोहित नलवडे यांनी दिलेल्या पत्राची  तात्काळ गांभीर्याने दखल घेतली...


या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असल्याने प्रत्यक्षात पाहणी करण्याकरिता. आवश्यक आहे, मी शिफारस करतो की थेट पाहणीसाठी पंचायत राज समितीच्या माध्यमातून सदरहू तालुक्याचा दौरा आयोजित करावा यासाठी मा.समिती प्रमुख,पंचायत राज्य समिती, विधान भवन मुंबई यांना मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी शिफारस पत्र दिले आहे.