सांगली, दि. १२ (जि. मा. का.): केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानाच्या अनुषंगाने नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांनी राष्ट्रध्वज फडकविताना भारतीय ध्वज संहितेतील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानाचा कालावधी ९ ते १७ ऑगस्ट २०२६ असा आहे. या कालावधीत नागरिक, खासगी संस्था, शैक्षणिक संस्था तसेच विविध आस्थापनांना अभियानाच्या कालावधीतील कोणत्याही दिवशी राष्ट्रध्वज फडकविता येणार आहे. मात्र, राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा, सन्मान व पावित्र्य अबाधित राहील, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्र शासनाने जुलै २०२२ मध्ये भारतीय ध्वज संहितेत केलेल्या सुधारणेनुसार, खुल्या जागेत किंवा नागरिकांच्या घरावर फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज दिवस तसेच रात्र अशा दोन्ही वेळेस फडकविता येतो. त्यामुळे ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार राष्ट्रध्वज फडकविण्याची सुविधा उपलब्ध आहे.
तसेच अभियानाच्या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी विशिष्ट दिवस किंवा वेळेचे बंधन नाही. नागरिकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी व कोणत्याही वेळी राष्ट्रध्वज फडकविता येईल. मात्र, राष्ट्रध्वज फडकविताना त्याचा योग्य सन्मान राखणे आणि भारतीय ध्वज संहितेतील सर्व नियम व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे.
देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा, तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि पावित्र्य जपावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


