पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली स्वगणना
नागरिकांनी १५ मेअखेर स्वगणना करण्याचे आवाहन
सांगली, दि. 1, (जि. मा. का.) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशव्यापी राष्ट्रीय जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली असून, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण करत सांगली जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऑनलाईन पद्धतीने स्वगणना प्रक्रियेवेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजिता महापात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जनगणना 2027 ची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार पडणार असून नागरिकांच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. 'जनगणना २०२७' अंतर्गत पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असून se.census.gov.in या संकेतस्थळावर व्यक्ती स्वत: व आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकणार आहेत. तरी सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी स्वगणना करून राष्ट्रीय कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत घरयादी व घरगणना करण्यात येणार आहे. यामध्ये प्रगणक गृहभेटी देणार असून प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करणार आहे. जनगणनेतील सहभाग हे आपले कर्तव्य असून, प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेल्फी पॉईंटवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सत्यजीत देशमुख यांनी सेल्फी घेत नागरिकांना स्वगणनेचे आवाहन केले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


