समर्थ संस्थेची जत येथे वक्तृत्व व संवाद कौशल्य कार्यशाळा संपन्न
जत दि. १२ : समर्थ बहुउद्देशीय विकास संस्थेमार्फत दि. 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान आयोजित ‘भाषण कला व संवाद कौशल्य’ या वक्तृत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ गंगाबाई गोब्बी शिक्षणशास्त्र अध्यापक विद्यालय, जत येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास जतचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांच्या शुभहस्ते उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना डॉ. आरळी यांनी उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की,
“वक्तृत्वातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात प्रभावी संवाद कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः महिलांसाठी राजकीय क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण झाल्या असून त्यांनी वक्तृत्व कला आत्मसात करून पुढे यावे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य सेवा मंचचे उपाध्यक्ष माणिक कोडक सर होते. त्यांनी आपल्या भाषणात वक्तृत्व कार्यशाळा ही काळाची गरज असल्याचे सांगून, अशा उपक्रमांमुळे व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रात यश मिळवणे अधिक सोपे होते, असे मत व्यक्त केले.
प्रास्ताविकात दिगंबर साळुंखे सर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी यूट्यूब स्टार व प्रशिक्षक अनिल बन्ने यांनी बोलताना, “फक्त बोलण्याच्या कौशल्यावर आम्ही दोन यूट्यूब चॅनल यशस्वीपणे चालवत आहोत आणि जत तालुक्यात सर्वाधिक सबस्क्राइबर्सचा सन्मान मिळवला आहे,” असे सांगितले.
प्रशिक्षक मनीष काळे देशमुख यांनी महाराष्ट्रात दहा हजारांहून अधिक वक्ते तयार करण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी साहित्य सेवा मंच जतचे नूतन अध्यक्ष लवकुमार मुळे व उपाध्यक्ष माणिक कोडक सर यांचा सत्कार करण्यात आला. लवकुमार मुळे यांनी वक्तृत्व हे साहित्य क्षेत्राचे भक्कम पायाभूत साधन असल्याचे नमूद केले.
कार्यशाळेत नगरसेविका संगीता सोनुले, नयना सोनवणे, सुषमा सुर्वे, मनीषा साळे, माधुरी पाटील, स्वाती बडचिकर, अभिलाषा कोडक, मयुरी सावंत, राजश्री उबाळे, मुस्कान नदाफ, योजना वाघमारे यांच्यासह अनेक प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, मेडल व ट्रॉफीचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता सूर्यवंशी मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखे यांनी मानले.
या कार्यक्रमास डॉ. सुर्वे, राजू कोळीसो, हेमंत भोसले, लोखंडे सर, व्यंकटेश राठोड सर, चव्हाणसो, डॉ. सतीश येलपले, अरुण आरळी, प्रवीण निगडी यांच्यासह जत परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰










