भिलवडी वार्ताहर : दि. ०३ मार्च २०२६
भिलवडी ता. पलूस येथील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व वक्ते तसेच सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे कार्यवाहक सुभाष कवडे यांच्या “जांभळमाया” या ललित लेखसंग्रहाला यंदाचा ‘माहेर साहित्य रत्न पुरस्कार 2026’ जाहीर झाला आहे. पुणे येथील सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माहेर संस्था तर्फे हा राज्यस्तरीय पुरस्कार एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.
माहेर संस्था ही समाजातील अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणारी भारतातील 75 शाखा असलेली सामाजिक संस्था असून, दरवर्षी मराठीतील 20 साहित्यिकांच्या उत्कृष्ट कलाकृतींचा राज्यस्तरावर गौरव करते. नुकत्याच रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा येथील शाखेत पार पडलेल्या भव्य समारंभात महाराष्ट्रातील निवडक 20 पुस्तकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समारंभात सर्व साहित्यिकांचे औक्षण करून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. माहेर प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून साहित्यिक व त्यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. रत्नागिरी येथील नामवंत पत्रकार, संपादक व प्राध्यापक यशवंत मसुरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी सुभाष कवडे यांनी आपल्या कवितेचे सादरीकरण करून माहेर संस्थेचा गौरव केला. प्रा. मसुरकर यांनी “जांभळमाया” पुस्तकातील संघर्षाचे ललित व प्रेरणादायी वर्णन सर्वांसाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.
समारंभात पुरस्कारप्राप्त पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. वृषभ जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
माहेर संस्थेचा हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. सुभाष कवडे यांची आतापर्यंत 14 पुस्तके प्रकाशित झाली असून शिक्षण, साहित्य, समाजसेवा व वाचन चळवळीतील योगदानाबद्दल त्यांना 50 हून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल भिलवडी परिसरातून सुभाष कवडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समारंभास रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, साहित्यिक तसेच माहेर केंद्रातील अनाथ महिला, वृद्ध आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी माहेर संस्थेतील वृद्ध, मुले व विद्यार्थिनींनी प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.




