- मिरज येथे ‘श्रीमंतयोगी’ महानाट्याचे दिमाखदार सादरीकरण
- सांगलीकरांच्या कलेचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
सांगली दि. 19 (जि. मा. का.) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, परंतु केवळ इतिहास वाचून न थांबता, महाराजांची तत्त्वे आणि मूल्ये जर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात आचरणात आणाव, तर आपल्या आयुष्याचे नक्कीच सोने होईल. आजच्या शिवजयंतीनिमित्त हीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल," असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
शिवजयंतीच्या औचित्याने मिरज येथील बालगंधर्व नाट्यमंदिरात ‘श्रीमंतयोगी’ या शिवचरित्रावर आधारित महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हाधिकारी यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे, माजी मंत्री आण्णा डांगे, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, लेखक राजेंद्र पोळ आदि मान्यवर उपस्थित होते.
डोळ्यांचे पारणे फेडणारे सादरीकरण
या महानाट्याबद्दल सांगताना जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की, सांगलीच्या कलाकारांनी सांगलीकरांसाठी सादर केलेला हा कार्यक्रम अत्यंत देखणा आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. "आज या रंगमंचावर तुम्ही हुबेहूब 'शिवभारत' उभे केले आहे. सर्व कलाकारांची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. अडीच तास विना-मध्यंतर (Non-stop) चाललेल्या या प्रयोगात प्रत्येक कलाकाराने आपल्या कौशल्याचा आणि ऊर्जेचा कस लावला," अशा शब्दांत त्यांनी नाटकाच्या चमूचे अभिनंदन केले.
लेखन आणि अभिनयाचा सुवर्णसंगम
लेखक राजेंद्र पोळ यांच्या संहितेचे कौतुक करताना श्री. काकडे म्हणाले की, "या नाटकात शब्दांपेक्षा अभिनयाला आणि नृत्याला जास्त महत्त्व देण्यात आले होते, जे प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले. जिजाऊंची कठोरता आणि त्यांनी दिलेली दिशा, तानाजी मालुसरेंचा पराक्रम आणि तुकोबारायांचा प्रसंग, या सर्वच प्रसंगांनी प्रेक्षकांना ४०० वर्षांपूर्वीच्या कालखंडात नेले. आज आपण ही विचारांची मोठी शिदोरी घेऊन घरी जात आहोत."
यावेळी माजी मंत्री आण्णा डांगे व राजेंद्र पोळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






