yuva MAharashtra हिंद दी चादर: महाराष्ट्राच्या मातीत गुंजणारा मानवतेचा जयघोष

हिंद दी चादर: महाराष्ट्राच्या मातीत गुंजणारा मानवतेचा जयघोष



 

          महाराष्ट्राची भूमी ही मुळातच क्रांती आणि अध्यात्माचा एक अपूर्व संगम राहिलेली आहे. ज्या मातीने संत ज्ञानेश्वर-तुकारामांची अभंगवाणी जपली, त्याच मातीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हुंकारही ऐकला. आज याच भूमीत श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या अजोड बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक औचित्यावर 'हिंद दी चादर' हा उपक्रम शासन स्तरावर राबवला जात आहे, तो केवळ एका धार्मिक उत्सवाचा भाग म्हणून नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक वारशातील एका विस्मृतीत गेलेल्या सुवर्णधड्याची उजळणी करण्यासाठी. शिखांचे नववे गुरू, श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ४०० व्या प्रकाश पर्वानंतर सुरू झालेला हा जागर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचे मुख्य कारण म्हणजे या महामानवाचा आणि महाराष्ट्राचा असलेला एक अदृश्य पण अत्यंत घट्ट असा ऐतिहासिक बंध. नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भव्य शहीदी समागम कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे या निमित्ताने.





गुरु तेग बहादूरजींना 'हिंद दी चादर' म्हटले जाते, कारण त्यांनी धर्माच्या पलीकडे जाऊन मानवी हक्कांचे रक्षण केले. परकीय राजवटीत जेव्हा अत्याचार झाले, तेव्हा स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेच्या रक्षणासाठी दिल्लीच्या चांदणी चौकात आपले शीर देणारा हा महान क्रांतिकारी संत होता. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण ज्या काळात दक्षिण भारतात छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध तलवार गाजवत होते, त्याच काळात उत्तर भारतात गुरुजी आपल्या बलिदानातून 'निर्भयता' पेरण्याचे काम करत होते. या दोन्ही महान विभूतींचे शत्रू आणि त्यांचे ध्येय - म्हणजेच 'धर्म आणि स्वराज्याचे रक्षण' - हे एकच होते. हा ऐतिहासिक समांतर प्रवास आजही महाराष्ट्रातील नागरिकांना प्रेरणा देणारा ठरतो.

  या उपक्रमाचे महत्त्व आजच्या धकाधकीच्या आणि विखुरलेल्या समाजात अधिक अधोरेखित होते. 'हिंद दी चादर' उपक्रम केवळ शीख समुदायासाठी मर्यादित नाही, तर तो प्रत्येक भारतीयासाठी आहे. आजच्या पिढीला हे समजणे आवश्यक आहे की, आपण ज्या लोकशाहीत आणि धार्मिक स्वातंत्र्यात श्वास घेत आहोत, त्याची पायाभरणी अशा अनेक सर्वोच्च बलिदानांतून झाली आहे. इतर समाजातील लोकांसाठी या उपक्रमाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'सर्वधर्मसमभावा'ची प्रत्यक्ष कृती त्यांना पाहायला मिळते. जेव्हा कोणत्याही धर्माचा पाईक गुरुजींच्या बलिदानाचा इतिहास वाचतो, तेव्हा त्याला हे उमजते की मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे.

 


         महाराष्ट्राचा गुरु तेग बहादूरजींच्या कार्याशी असलेला संबंध केवळ विचारांपुरता मर्यादित नसून तो भौगोलिक आणि आध्यात्मिकही आहे. शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांनी आपले शेवटचे वास्तव्य महाराष्ट्रातील नांदेड येथे केले, जिथे आज 'तख्त सचखंड श्री हुजूर साहिब' विराजमान आहे. गुरु तेग बहादूरजींच्या तत्त्वांचा वारसा घेऊनच धाकटे गुरु महाराष्ट्रात आले. तसेच, शीख धर्माच्या पवित्र 'गुरु ग्रंथ साहिब' मध्ये महाराष्ट्राचे लाडके संत नामदेव महाराज यांची ६१ पदे समाविष्ट आहेत. हा भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पंजाबला महाराष्ट्राशी आणि

 

 

महाराष्ट्राला शीख इतिहासाशी कायमचा जोडून ठेवतो. 'हिंद दी चादर' हा उपक्रम म्हणजे या ऐतिहासिक ऋणांची कृतज्ञतापूर्वक केलेली परतफेड आहे.

 

          ज्या महाराष्ट्राने नेहमीच अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची परंपरा जपली आहे, त्या महाराष्ट्रात गुरु तेग बहादूरजींचे विचार घराघरात पोहोचणे म्हणजे लोकशाही मूल्यांना बळकट करणे होय. हा उपक्रम आपल्याला शिकवतो की, जेव्हा न्याय आणि सत्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्याग हाच सर्वात मोठा विजय असतो. म्हणूनच, 'हिंद दी चादर' हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर उमटलेला एक असा ठसा आहे, जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना धैर्याने आणि स्वाभिमानाने जगण्याची वाट दाखवत राहील.

 

                               लेखन - सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर


  🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰



🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰

𝗟𝗶𝗻𝗸𝘀

YouTube Channel

🌐 https://youtube.com/@thejanshakatinews5707

News Portal

🌐 www.theJanShaktiNews.in

🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰