BANNER

The Janshakti News

No title



======================================
======================================

           सांगली | दि. 03 जानेवारी 2023




प्रा.मधुकर वायदंडे नावाच संघर्षशील वादळ शमले...!
------------------------------------
दलित महासंघाच्या स्थापनेतील एक बुरुज ढासळला...!
------------------------------------
प्रा.मधुकर वायदंडे काळाच्या पडद्याआड
------------------------------------

    गेली तीन चार दशके प्रशासनाच्या उरात धडकी भरवणार आंदोलन करणारे दलित महासंघ या लढाऊ आणि जहालवादी संघटनेच्या संस्थापकापैकी एक असलेले असलेले प्रा. मधुकरजी वायदंडे यांचं शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाल्याची बातमी कानावर आली आणि मनाला अतीव दुःख झाले
      मी (संदीप तात्या ठोंबरे) कित्येक वर्ष मधुकरजी वायदंडे या वादळा सोबत काम केले आहे दलित महासंघ या जहाल संघटनेचे बीज रोवणारे ते प्रभावशाली नेते होते
 फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे नरवीर उमाजी नाईक या महापुरुषांचा विचार खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यावर पोहोचवणारा एक अवलिया म्हणून त्यांच्याकडे मी पाहतो दलित महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे प्राध्यापक सुकुमारजी कांबळे आणि मधुकरजी वायदंडे प्राध्यापक राम कांबळे डॉ. विजय चांदणे अशी अनेक नावे घेता येतील परंतु सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातील प्राध्यापक मधुकरजी वायदंडे यांची धडपड ही औरच होती वायदंडे सर आंदोलनात आले म्हटलं की न्याय मिळालाच अशी प्रथा झाली होती 
दलित महासंघ ही जरी मातंग समाजाचा जनाधार असलेली संघटना असली तरी सुद्धा नेत्यांच्या वैयक्तिक मतभेदापोटी दलित महासंघात पडलेली फुट मधुकरजी वायदंडे सर यांच्या मनाला पटणारी नव्हती या फुटीच्या वेदना ते सातत्याने बोलूनही दाखवत होते काही महिन्यापूर्वी प्राध्यापक सुकुमारजी कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला वायदंडे सर उपस्थित होते 
त्यांनी येणाऱ्या काळामध्ये मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया आणि माझा दलित महासंघ आपण मिळून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक निष्ठेने आणि जोमात काम करू असा शब्द दिला होता तर आमच्या सुधाकरला (सुधाकर वायदंडे) सामाजिक क्षेत्राबरोबर राजकारणाची ही आवड आहे सुधाकर भविष्यामध्ये चांगलं काम करू शकतो तो महाराष्ट्रात पोहोचलेला सर्वसामान्य असला तरी सर्वमान्य कार्यकर्ता आहे येणाऱ्या काळात सुधाकरला बरोबर घेऊन काम करूया असा आशावाद प्राध्यापक मधुकरजी वायदंडे यांनी त्यावेळी सर्वांसमोर व्यक्त केला होता.
     प्राध्यापक मधुकरजी वायदंडे यांच्या आकस्मिक जाण्यानं प्रस्थापित राजकारणांच्या उरात धडकी भरवणारा एक सिंह हरपल्याची भावना आज समाज मनामध्ये झाली आहे समाजात काम करत असताना वायदंडे सरांना हुतात्मा संकुलाचे मार्गदर्शक क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचा सहवास लाभला तसाच सहवास दलित महासंघालाही लाभला होता आंबेडकरी चळवळीच्या पाठीमागे नेहमीच सातत्याने नागनाथ आण्णा ठामपणे उभे राहायचे.आण्णांनी दलित महासंघ ही चळवळ बघुन संघटनेला अम्बेसिडर गाडी दिली होती.तीच गाडी घेऊन कित्येक वर्षे वायदंडे सर काम करत होते
 दलित महासंघ आणि नागनाथांना यांच्यामधील दुवा म्हणजे प्राध्यापक मधुकरजी वायदंडे सर होय.
त्यावेळी नागनाथ अण्णांच्या हुतात्मा संकुल परिसरात अनेक फासेपारधी समाजाची कुटुंबे.. त्यांची उध्वस्त झालेले संसार ..उघडी.. नागडी फिरत असलेली त्यांची लहान मुलं यांचेकडे पाहून मधुकरजी वायदंडे सर यांच्या काळजाला भेगा पडत होत्या त्यांच मन अस्वस्थ होत होते
 ते पारधी समाजातील कार्यकर्त्यांची ते चौकशी करत परंतु कधीच माणसात न आलेला समाज हा वायदंडे सरांच्या बरोबर यायलाही धजवत नव्हता छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात राजाश्रय मिळालेल्या या समाजाची ही अवस्था कशी झाली असेल याची कल्पना ते करत होते.
 परंतु जिद्द आणि जिद्दीला पेटलेला माणूस म्हणजे वायदंडे सर त्यांनी अविरत प्रयत्न करून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या पारधी समाजातील काही लोकांना बरोबर घेऊन पारधी समाज सुधारू शकतो, तोही माणूस आहे, त्यालाही माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार आपल्याला संघर्ष करून मिळवायला पाहिजे याची जाणीव  पारधी समाजाला करून  दिली राणामाळात डोंगरा दर्यात उसाच्या फडात पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी कायम पळत असलेला हा पारधी समाज या समाजाला डोंगरदर्यातून उसाच्या फडातून बाहेर काढणारा आणि त्यांना माणसात माणूस पण मिळवून देण्यासाठी धडपडणारा संघर्ष योद्धा म्हणजे मधुकर वायदंडे सर ...आता रोजच ते पारधी समाजातील मुला बाळांच्या घोळक्यात दिसायचे पारधी आणि मधुकर वायदंडे हे जणू समीकरणच झाले होते अशातच मातंग समाजातील तथाकथित नेत्यांनी फासेपारधी समाजाचा नेता म्हणून हिणवले देखील तरीही ते अशा काही लोकांना जास्त महत्त्व न देता काम करत राहिले.
महाराष्ट्राचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर आबा पाटील सांगली जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शहीद अशोक कामटे जिल्हाधिकारी मनीषा म्हैसकर सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रिचा बागला  विट्याचे जे के बापू कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीच्या पोलीस मुख्यालयातील हॉलमध्ये राज्यातील मोस्ट वॉन्टेड पारध्यांच्या आत्म समर्पणाचा कार्यक्रम आयोजित करून पारधी पुनर्वसनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते.
शासनाने गणेश उत्सव काळामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने "एक गाव एक पारधी " ही संकल्पना अवलंबववावी आणि या महाराष्ट्रातील पारध्यांच पुनर्वसन करून त्यांना घर जागा जमीन आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली होती.आत्मसमर्पणाच्या बदल्यात संपूर्ण पुनर्वसन ही एकमेव मागणी त्यांनी केली होती.यावेळी माझ्या ( संदीप तात्या ठोंबरे)बरोबर शशिकांत वायदंडे,जे के बापू कांबळे आनंदराव थोरात ,नंदकुमार होळकर असे अनेक जण उपस्थित होते.काहींची नाव आठवत नाहीत. या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमामुळे पारधी समाजाचा पुनर्वसनाचा विषय राज्यात गाजत होता तर नक्षलवादी भागांमध्ये नक्षल्यांच्यासाठी त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी काम करणारे राजगोंड आदिवासी पारधी समाजाचे नेते राम आत्राम हे ही पारधी समाजाच्या आत्मसमर्पण कार्यक्रमास त्यावेळी उपस्थित होते.
 राज्यातील नक्षलवादी आणि पारधी समाज याच्यामध्ये फरक नसून नक्षलवाद्यांनी आपल्या न्याय हक्कासाठी हातात शस्त्र घेतली तशाच पद्धतीने पारधी समाजाने सुद्धा आपल्या पोरा बाळांच्या पोटापाण्यासाठी चोर्यामार्या केल्या दोन्हीही समाज भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराची अंमलबजावणी करा आणि आम्हाला सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेत सामावून घ्या एवढीच मागणी करत असताना सुद्धा प्रशासन त्यांच्याकडे बघायला तयार नाही ही शोकांतिका होती.
आदिवासी पारधी समाजासाठी स्वतंत्र लढ्याच्या माध्यमातून त्यांनी कार्य चालू केले सांगली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यामध्ये संमेलनावर मोर्चा काढून संमेलनाचा निधी हा पारधी पुनर्वसनासाठी द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती तर चिपळूण येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मोर्चा काढून पारधी समाजाच्या प्रश्नांचा ठराव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करून घेतला कदाचित ही इतिहासातील पहिलीच घटना असेल आपल्या साठ वर्षाच्या आयुष्यातील 35 ते 40 वर्षे समाजकारणासाठी वाहून घेणारे एक अवलिया नेते म्हणून समाज वायदंडे सर यांच्या कडे बघत होता.
 सुरुवातीला प्रा. सुकुमार कांबळे स्मृतीशेष मा.आत्मारामजी चांदणे साहेब   प्रा.मच्छिंद्र सकटे  प्रा. राम कांबळे यांनी महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून काढले होते दलित पॅंथरच्या फुटी नंतर दलित बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी टीट फॉर टॅट म्हणजे जशास तसे उत्तर देण्याची रस्त्यावरची भाषा बोलणारा दलित महासंघ म्हणजे महाराष्ट्रातील चळवळीचा एक ज्वाजल्य इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो आज या इतिहासाकडे मागे वळून पाहताना दलित महासंघ या संघटनेची नव्हे तर इतिहासाचीच शकले पडलेली दिसतात प्रत्येक जण स्वार्थासाठी बाजूला गेला आणि आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या नादात राज्यातील समाज कधी होरपळून गेला याची कदाचित नेत्यांना फिकीर नसावी आणि हीच गोष्ट प्राध्यापक वायदंडे सरांच्या मनाला लागली होती मातंग समाजाच्या एकत्रिकरणसाठी त्यांचा पुढाकार हा फार महत्त्वाचा होता मुंबईमध्ये घाटकोपर या ठिकाणी दंगल झाली दंगलीमध्ये गोळीबार झाला आठ दहा लोकांना आपला जीव गमवावा लागला या घटनेनंतर राज्यातील बौद्ध समाज संतापला होता आंबेडकरवादी अनुयायी भडकलेले होते अशा मध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली होती ती रिपब्लिकन ऐक्याची...! रिपब्लिकन ऐक्याच्या धरतीवर राज्यातील मातंग समाजाचा जनाधार असलेली संघटना म्हणून दलित महासंघाच्या संपूर्ण एकत्रीकरणासाठी प्राध्यापक वायदंडे यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या पुढाकाराला काही अंशी यशही आले होते परंतु परत येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे दलित चळवळीला फुटीचा शाप आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते तदनंतर मात्र चळवळीला फुटीचे ग्रहण लावणाऱ्यांना वायदंडे सरांनी कधीच जवळ केले नाही हेही वास्तव आहे मुळातच अपेक्षांच्या ओझाखाली न राहता वास्तववादी चळवळ उभा करणे हेच त्यांना अभिप्रेत होतं सामाजिक जीवनामध्ये नाकारलेल्यांना स्वीकारण्याचा त्यांना माणूस पण देण्याचा महत्वकांक्षी प्रयोग त्यांनी आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या माध्यमातून राज्यभर केलेला दिसतो.गोरगरिबांच्या संसारासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी करुण घेणारे बापू बिरु वाटेगावकर यांची तुरुंगातून सुटका झाली त्यावेळी त्यांची कुरळप या त्यांच्या गावातून ट्रॅक्टर मधुन मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत माझ्या सहीत कुरळप गावचे नेते आणि राजाराम बापू पाटील कारखान्याचे चेअरमन श्री पी आर पाटील दादा उपस्थित होते हजारोंचा जनसमुदाय मिरवणुकीत सामील होता . यावेळी वायदंडे सर म्हणाले होते
बापू बिरु वाटेगावकर यांच्या मधला गुन्हेगार नव्हे तर त्यांच्यातली माणुसकी आणि त्यांच कार्य पहावं त्यांच्या तला माणुस शोधा असा इशारा त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला होता
 प्रा. मधुकर वायदंडे म्हणजे एक वादळ होतं त्यांची वेगवेगळी अफलातून आंदोलने त्या आंदोलनाला असणारी वेगवेगळी नावे या नावांचीच दहशत आणि धास्ती प्रशासनाला लागून राहिली आपल्या आयुष्यामध्ये हजारो आंदोलने करणारा आणि आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देणारा साधा आणि स्वच्छ माणूस तसाच कडक शिस्तीचा माणूस..
 वेळेचे भान आणि वेळेची जाण असणारा माणूस त्यांच्यामध्ये सातत्याने दिसायचा सांगली मिरजेतील बाळासाहेब ठाकरे यांची सभा उधळण्याचं धाडस करताना प्रा. सुकुमार कांबळे आणि मधुकर वायदंडे यांनी घेतलेला पुढाकार सर्वमान्य आहे
प्रा. मधुकरजी वायदंडे यांच्या सानिध्यात आलेले माझ्यासारखे राज्यातील असंख्य कार्यकर्ते आज त्यांच्या आठवणीने घायाळ झालेले आहेत राज्यातील दलित बहुजन समाजाला दिशा देण्याचे काम आणि फुले शाहू आंबेडकर आण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने चालणाऱ्या चळवळींना बळकटी देण्याचे काम आज त्यांच्यापासून शिकलेले हजारो कार्यकर्ते करत आहेत
आज शेवटच्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो कार्यकर्त्यांचा उसळलेला जनसागर त्यांची चळवळीतील श्रीमंती सांगून गेला दहा पाच  मजल्याच्या बिल्डिंग बांधत बसण्यापेक्षा सामाजिक न्यायाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या उपेक्षित राहिलेल्या दहा पाच समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांना सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आणण्याचे स्वप्न साकारलेल्या मधुकर वायदंडे यांना आज हजारो जनसागरांन साश्रू पूर्ण अश्रूंनी त्यांना अभिवादन केलं.
 अमर रहे अमर रहे मधुकरजी वायदंडे अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणांनी कुरळच्या बाजारपेठा दणाणून सोडल्या होत्या त्यांच्या घरापासून सुरू झालेली ही अंत्ययात्रा त्यांच्या कार्याचा इतिहासाची जणू साक्षच देत होता आयुष्यभर रस्त्यावरची लढाई करताना फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या नावाचा जयघोष करत रस्त्यांवरून हजारोंचा मोर्चा काढणारे मधुकर वायदंडे आज त्यांच्या शेवटच्या अंत्ययात्रेत मात्र शांतच दिसले परंतु त्यांनी घडवलेले हजारो कार्यकर्ते आज त्यांच्याच भाषेत त्यांच्याच अंत्ययात्रेत त्यांच्याच नावाच्या विजयाच्या घोषणा देत होते अत्यंत मनाला हेलावणाऱ्या घोषणा काळजाचं पाणी करत होत्या तर अनेक जण आपल्या जुन्या आठवणी काढून डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करून देत होते आज त्यांचा शेवटचा आयुष्यातील प्रवास संपताना नेहमी ते पोलीस प्रशासनाची बाजू घेत कायदा आमच्या बापाचा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी आपण योग्य करावी पारधी समाज मातंग समाज रामोशी समाज हा जरी चोऱ्या मार्या करत असला तरीसुद्धा इंग्रजांनी आमच्या माथ्यावर मारलेला चोरीचा कलंक पुसायला आम्हाला वेळ लागेल पण ते कलंक पुसण्याचे काम आम्ही करीत आहोत .
पोलिसांनी माणसातील गुन्हेगार शोधण्यापेक्षा गुन्हेगारातील माणूसपण शोधावं यासाठीचा त्यांचा अट्टाहास आज अंत्ययात्रेत सुद्धा मला दिसून आला त्यांचा अंत्यविधी सुद्धा कुरळप पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या दफणभुमी मध्ये झाला . अखेरचा निरोप घेताना आणि निरोप देताना सर्वांच्याच जीवांची घालमेल झालेली मी पाहिली आहे
प्राध्यापक मधुकरजी वायदंडे यांच्या असंख्य आठवणी त्यांची वेगवेगळ्या विषयावर गाजलेली अनेक आंदोलने या पुढील काळात आम्हा आंबेडकरवादी चळवळीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चितच प्रेरणादायी असतील आज त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झालेले त्यांचे सहकारी प्राध्यापक सुकुमारजी कांबळे प्राध्यापक राम कांबळे डॉक्टर विजय चांदणे प्राध्यापक मोरे सर इंदुताई कोरपाळे मॅडम ,तानाजी साठे शंकर महापुरे डी.जे.दादा.साठे.उत्तम आप्पा चांदणे सुनिल बनसोडे सतिष लोंढे अशोकराव वायदंडे नंदकुमार नांगरे, आकाश मदने अतुल चव्हाण गॅब्रियल तिवडे, आकाश तिवडे यांच्यासह पंचक्रोशीतील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे असंख्य लोक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. या सर्वांच्याकडे  हवालदिल चेहऱ्याने सर्वांच्या कडे आशेच्या नजरेने पाहणारा सुधाकर वायदंडे आज मी पाहिला येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील दलित बहुजन चळवळीचा एक महानायक म्हणून प्रा.मधुकरजी वायदंडे यांच्या आठवणी चिरंतर समाज मनामध्ये रहाव्यात यासाठी निश्चित त्यांचा कार्याचा आदर्श घेऊन आम्ही काम करू 
त्यांच्या हातून राहिलेले चळवळीचं अपूर्ण काम पूर्ण करण्याची ताकद आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या आशीर्वादाने लाभो हीच प्रभु ईश्वरचरणी प्रार्थना...!
-------------------------------------------------------------------
मा.संदीप तात्या ठोंबरे
              डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया
                 महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆