पलूस दि. २१ : तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण कल्याणासाठी ग्रामपंचायतींनी ठोस पावले उचलावीत, अशा सूचना पंचायत समिती पलूसकडून देण्यात आल्या आहेत. दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी प्रहार संघटनेसोबत पंचायत समिती येथे पार पडलेल्या बैठकीतील निर्णयांच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सर्व ग्रामपंचायतींना पत्राद्वारे मार्गदर्शन केले आहे.
बैठकीत दिव्यांगांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्वउत्पन्नातून किमान ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखून तो स्थानिक दिव्यांगांना समसमान पद्धतीने १०० टक्के खर्च करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, दिव्यांग व्यक्तींच्या अडचणी जाणून घेण्यासाठी प्रत्येक तीन महिन्यांत एकदा ग्रामपंचायत स्तरावर बैठक आयोजित करण्याचेही निर्देश आहेत. ग्रामविकास विभागाच्या २४ सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार, गावातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची नोंदणी करून त्यांची सविस्तर वैयक्तिक माहिती संकलित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दिव्यांगांच्या विकास योजनांची प्रभावी आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, सार्वजनिक ठिकाणे, संकेतस्थळे, वाहतूक व्यवस्था व इतर सुविधा दिव्यांगांसाठी सुलभ (Accessible) करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या निर्णयांमुळे पलूस तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्काच्या सुविधा अधिक प्रभावीपणे मिळण्यास मदत होणार असून, ग्रामपंचायतींच्या कामकाजातही समावेशकतेला चालना मिळणार आहे.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰


