नवरात्रोत्सवनिमित्त महिला सबलीकरणासाठी विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभार्थींची इतरांसाठी प्रेरणादायी विशेष लेखमालिका क्रमश:
नवदुर्गा लेखमाला भाग २
शासकीय व स्वयंसेवी बालगृहातील “त्या” तिघींनी
संकटांना हरवून घडवले जिद्दीने आयुष्य
परिस्थितीने किंवा आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनेक चिमुकल्यांना आपल्या कुटुंबाच्या पंखाखाली सुरक्षित आयुष्य जगता येत नाही. शासनाची बालगृहे किंवा अनाथाश्रमात ते वाढतात. परिस्थितीवर मात करून त्या तिघींनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बाल गृहाच्या सावलीत स्वतःच्या स्वप्नांना बळ देत गगनभरारी घेतली आहे. हे सिद्ध केले आहे अश्विनी माने, निकिता अभ्यंकर आणि ऋतुजा शिंदे या मुलींनी.
अश्विनी माने – संघर्षातून पोलीस सेवेत
अश्विनी मानेच्या आईने कठीण परिस्थितीत काळजावर दगड ठेवून तिला स्वयंसेवी संस्था भगिनी निवेदिता बालगृहात सोपवले. तिथे शिक्षण घेत घेत खेळात, एनसीसीमध्ये ती चमकली. पोलिस सेवेत जाण्याचे स्वप्न तिने जीव तोडून मेहनत करून पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलिसात निवड होऊन आज ती कर्तृत्वाने उभी आहे. आज मुंबई पोलिसांत भरती होऊन ती केवळ स्वतःचे आयुष्य घडवत नाही, तर इतर मुलींनाही प्रेरणा देत आहे. आज ती पगारातील काही हिस्सा गरजू मुलींसाठी खर्च करण्याचा मानस व्यक्त करते.
निकिता अभ्यंकर – अनाथ मुलगी ते शासकीय नर्स
निकिता विजय अभ्यंकर हिचा प्रवास अधिक हृदयस्पर्शी. वयाच्या दहाव्या वर्षानंतर ती आई-वडिलांविना वाढली. आजीच्या मदतीने ती भगिनी निवेदिता मुलींचे बालगृह, यशवंतनगरच्या बालगृहात दाखल झाली आणि १२ वीपर्यंतचे शिक्षण तिथे पूर्ण केले. अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रम, स्पर्धा यामध्येही ती चमकली. शिक्षण थांबवायचे नाही, हा तिचा ठाम निर्धार होता. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करून तिने सरकारी नोकरी मिळवली आणि आज रायगड जिल्ह्यात शासकीय परिचारिका म्हणून ती कार्यरत आहे. संसार, मातृत्व, सेवाभाव आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचा उत्तम समतोल साधत ती समाजासाठी आदर्श ठरली आहे.
ऋतुजा शिंदे – यांत्रिकी अभियांत्रिकीत जम
आईचे निधन, वडिलांचे दुर्लक्ष आणि असुरक्षित बालपण यामुळे ऋतुजा शिंदे शासकीय बालगृह, मिरज येथे दाखल झाली. पण तिच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने होती. तिने डिप्लोमा पूर्ण करून मेकॅनिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्यासाठी सामाजिक संस्थांचे साहाय्य आणि स्वतःची मेहनत हेच तिचे भांडवल होते. शिक्षणासोबत तिने नोकरी सुरू केली आणि आज पुण्यातील खाजगी कंपनीत काम करते. आज ती केवळ स्वतःसाठीच जगत नाही. वयानुरुप आलेल्या जबाबदाऱ्या स्वीकारून आपल्या भावाचे शिक्षण व आजी-आजोबांचा सांभाळ ती मनापासून करत आहे.
आई वडील सोबत नसताना एका टप्प्यावर आयुष्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. मात्र बाल गृहाच्या साथीने या तिघींनी जिद्दीने स्वतःचे आयुष्य घडवून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.
लेखन - संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली
समन्वय - वर्षा पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांगली
संकलन - राऊ देशमुख, समुपदेशक
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰




