BANNER

The Janshakti News

ब्रम्हणाळ शिवारात बिबट्याचा वावर..








======================================
======================================

ब्रम्हणाळ (ता.पलूस) :          दि. ९ ऑक्टोबर २०२३

 बिबट्यामुळे कोणत्याही दुर्घटनेची वाट न बघता बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा..जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त केला जाणार नाही तोपर्यंत वनविभागाच्या ऑफिसमध्ये ठिया आंदोलन करण्यात येईल असा इशारा ब्रम्हणाळ येथील गावकऱ्यांनी वनविभागाला दिला.

  पलूस तालुक्यातील ब्रम्हणाळ येथे रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी क्रांती कारखान्याचे संचालक तथा उपसरपंच  सुभाष वडेर यांनी माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची विशेष बैठक  बोलवली होती. हि तातडीने बैठक घेण्याचे कारण होते की, गेल्या महिनाभर बिबट्या भिलवडी स्टेशन , भिलवडी , चोपडेवाडी , सुखवाडी , ब्राह्मणाळ , खटाव , वसगडे या परिसरामध्ये मुक्तपणे फिरत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्याचा वावर हा शेतामध्ये असून शेतकरी शेतमजूर यांना शेतात जाणे मुश्किलीचे झाले आहे.
 याबाबत संदीप राजोबा म्हणाले पहिल्यांदा ग्रामस्थांनी स्वतःचे संरक्षण केले पाहिजे तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये ब्रम्हनाळ गावामध्ये बिबट्याने अक्षरशः थैमान घातले असून काल सायंकाळी उपसरपंच सुभाष तम्मा वडेर यांच्या सुखवाडी रस्त्यालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्याजवळ बराच वेळ बिबट्या घुटमळत होता. त्यानंतर तो आज सकाळी ब्रम्हनाळ खटाव रस्त्यावरती सिताराम गुरव यांच्या शेताजवळ पहाटे आढळला आहे. सदर बिबट्या हा रात्री अप रात्री एमआयडीसी मध्ये कामाला जाणार येणाऱ्या लोकांना नेहमी रस्त्यावरती दिसत असतो. त्यातच आज सदरच्या बिबट्याने संतोष गुरव याचा पाठलाग केला त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण जास्तच निर्माण झाले आहे. 

बैठकीच्या दरम्यान वन विभागाशी संपर्क साधला असता सदरचे वनसेवक हे कडेगाव येथे होते खरं म्हणजे त्यांनी या एरियामध्ये उपस्थित असणं गरजेचं होतं त्याचबरोबर प्रभारी आर एफ ओ म्हणून चेतन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रात्री पेट्रोलिंग वाढवण्याची व्यवस्था केली जाईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

 ब्रम्हाळकर यापूर्वीच मगरीच्या हल्ल्यामुळे महापुरामुळे तसेच महापुराच्या वेळी घडलेल्या दुर्घटनेमुळे हैराण झालेले आहेत त्यातच आता भरीत भर म्हणून बिबट्यामुळे शेतात जाणे सुद्धा मुश्किल झालेले आहे तरी वनविभागाने एखादी दुर्घटना होण्याची वाट न पाहता सापळा लावून तात्काळ बिबट्याला जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली वरील विषयाचे गांभीर्य वनविभागाने जर समजावून घेतले नाही तर  जोपर्यंत बिबट्याचा बंदोबस्त केला जाणार नाही तोपर्यंत वनविभागाच्या ऑफिसमध्ये ठिया आंदोलन करण्यात येईल असे सांगितले त्यास संपूर्ण ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.
यावेळी क्रांती कारखान्याचे संचालक तथा उपसरपंच सुभाष वडेर , माजी सरपंच अशोक पाटील , ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील , संजय पाटील , संजय गावडे , तुकाराम बंडगर , अनिल राजोबा , डॉ. रफिक तांबोळी , हेमंत जगदाळे , प्रशांत बंडगर , शिवाजी गडदे , राजेंद्र मोळाज , विजय पाटील , रामचंद्र गडदे , आप्पासो राजोबा , अण्णा गावडे , अरुण मोळाज , अक्षय पाटील , संतोष गुरव यांच्या सह गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆