BANNER

The Janshakti News

आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या समाजकंटकास जामीन मिळू देणार नाही ; सरपंच राजेश्वरी सावंत उर्फ बेबीताई




=====================================
=====================================

भिलवडी | दि. २७ मार्च २०२३

सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील अंकलखोप या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. या गावात विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला असून याठिकाणी बाबासाहेबांची जाहीर सभाही झाली होती. बाबासाहेबांचा महानिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या पवित्र अस्थी गावातील काही लोकांनी अंकलखोप गावांमध्ये आणल्या आहेत. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी सांगली जिल्ह्यासह बाहेर गावाहून भीमअनुयायी अंकलखोप येथे येत असतात. अशा या पावनभूमीमध्ये गावातीलच एका समाजकंटकाने डॉ बाबासाहेब आंबेडकर , भगवान गौतम बुध्द तसेच मुस्लीम समाजाचे श्रध्देय स्थान अल्ला यांचे विषयी फेसबुकवरून आक्षेपार्ह लिखाण करुन पोस्ट केली होती. त्यामुळे अंकलखोप भिलवडी , माळवाडी या गावासह परीसरातील गावातील सामाजिक समतोल बिघडून सामाजिक तेढ निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती. अशा या समाजकंटकामुळे सर्व जातीधर्माच्या एकत्रित व सलोख्याने राहत असणाऱ्या अंकलखोप गावाच्या ऐतिहासिकतेला गालबोट लागले होते.त्याअनुषंगाने अंकलखोप येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली.यावेळी सर्वानुमते या निंदनीय घटनेचा निषेध करण्यात आला.
फेसबुक या सोशल मिडीयावरून महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पांडूरंग मधूकर सुर्यवंशी वय वर्षे ३२ रा.अंकलखोप ता.पलूस जि.सांगली या समाजकंटकाला भिलवडी पोलिसांनी तात्काळ अटक करून त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


पांडुरंग मधुकर सुर्यवंशी याला अंकलखोप गावातून कोणीही जामीन होणार नाही अथवा जामीन केला जाणार नाही. तसेच कडक शिक्षा व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत अंकलखोप गावच्या सरपंच राजेश्वरी शशिकांत सावंत उर्फ बेबीताई यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी गावातील काही प्रमुख नेते मंडळी व पलूस तालुक्यातील विविध भागातून आलेले विविध संघटनेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆