सांगली, दि. 28 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, मदत कार्य राबविण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एन.डी.आर.एफ) एक पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
या पथकामध्ये पथक प्रमुख संतोषकुमार तिवारी व इतर 24 जवान आहेत. या पथकाकडे बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमारत कोसळल्यानंतर शोध व सुटका कामी आवश्यक साहित्य सामग्री उपलब्ध आहे. मान्सून कालावधीमध्ये पडणारा पाऊस व हवामान खात्याकडील अंदाज पाहता त्यानुसार राज्य शासनाकडून एन.डी.आर.एफ. पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक मान्सून कालावधीपर्यंत सांगली जिल्ह्यात कार्यरत राहणार आहे.
या पथकामार्फत जिल्ह्यामधील संभाव्य पूर प्रवण भागातील क्षेत्र, शहरी भागातील धोकादायक इमारती, दरडग्रस्त गावांची पाहणी, धोकादायक औद्योगिक क्षेत्र इत्यादी पाहणी करण्यात येणार आहे. आपत्तीच्या काळात काय करावे व काय करू नये या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे एन.डी.आर.एफ पथकातील अधिकारी यांनी सांगितले.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰