सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : वैद्यकीय क्षेत्र हे सेवाव्रत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णसेवेचे महत्त्व लक्षात घ्यावे. जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयांनी शासनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे. तसेच, सामान्य माणसाचे आरोग्य उत्तम राहील, यासाठी सर्वच रूग्णालयांनी सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करून चांगला पायंडा पाडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालये, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णालये व इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, डॉक्टर्स व प्रतिनिधी यांच्यासमवेत आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस शासकीय रूग्णालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, सहाय्यक धर्मादाय आयुक्त डॉ. प्रियांगिनी पाटील, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे, धर्मादाय रुग्णालय निरीक्षक सचिन पाटील आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, धर्मादाय रूग्णालयांनी निर्धन रूग्णांवर मोफत तसेच दुर्बल रूग्णांवर 50 टक्के सवलतीत उपचार करण्याच्या नियमाचे काटेकोर पालन करावे. त्यासाठी प्रत्येकी 10 टक्के खाटा राखीव ठेवाव्यात व राखीव खाटांवर तेच रूग्ण असतील, याची दक्षता घ्यावी. जिल्हा शल्यचिकित्सक तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त व अन्य आरोग्य अधिकाऱ्यांनी धर्मादाय रूग्णालयांना अचानक भेटी देऊन नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी. दर महिन्याला याचा आढावा घ्यावा, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील 68 रूग्णालये येतात. या योजनेतील रूग्णालयांनी कोणत्याही प्रकारे अनामत रक्कम घेऊ नये. केवळ कागदपत्रांची पूर्तता नाही या कारणाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रूग्णांना उपचार नाकारू नयेत. संबंधितांकडून कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. रूग्णालयांत गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता रूग्णालय व्यवस्थापनाने घ्यावी. तसेच, आयएमए च्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, दिव्यांग, बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करावे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या समन्वयाने रूग्णालयांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाची माहिती द्यावी.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त डॉ. प्रियांगिनी पाटील म्हणाल्या, जिल्ह्यात 29 धर्मादाय रूग्णालये आहेत. या रूग्णालयांमध्ये 10 टक्के खाटा निर्धन व 10 टक्के खाटा दुर्बल रूग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, असा नियम आहे. धर्मादाय रूग्णालयांत निर्धन म्हणजे रक्कम रूपये एक लाख 80 हजार च्या आत उत्पन्न असलेल्या रूग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच दुर्बल म्हणजे रक्कम रूपये 1 लाख 80 हजार ते 3 लाख 60 हजार रूपयांदरम्यान उत्पन्न असलेल्या रूग्णांवर 50 टक्के सवलतीत उपचार केले जातात.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी शासनाने केलेल्या नियमावलीची माहिती रूग्णांना रूग्णालय व्यवस्थापनाने द्यावी. तसेच रूग्णालय धर्मादाय असल्याचा नामफलक दर्शनी भागात लावावा, असे सूचित केले.
यावेळी रूग्णालयांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयांचे डॉक्टर्स, प्रतिनिधी, आय एम ए चे पदाधिकारी आदि उपस्थित होते.
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰