सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांना नोटीस देण्यात आल्या असून, नियमानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ज्या प्रयोजनासाठी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे, तो उद्योग चालू करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी व तसे महामंडळास कळवावे, असे आवाहन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सांगली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील बंद उद्योग घटकांची पाहणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने माहे मार्च 2024 व जानेवारी 2025 मध्ये बंद उद्योग घटकांना उद्योग चालू करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु, अद्यापही काही उद्योग घटकांकडून भूखंडावर उद्योग सुरू केल्याचे दिसून येत नाही. तसेच काही बंद उद्योग घटकामध्ये बेकायदेशीर कृत्य केल्याचे पोलीस प्रशासनास निदर्शनास आलेले असून व भूखंडावर बेकायदेशीरपणे पोटभाडेकरु ठेवल्याचे निदर्शनास आलेले आहे. तरी अशा उद्योग घटकांच्या बाबतीत पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असून, त्यास उद्योग घटकाचे मालक सर्वस्वी जबाबदार राहतील व पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे बंद उद्योग घटकांनी ज्या प्रयोजनासाठी भूखंड घेतला आहे, तो उद्योग चालू करणेबाबत तातडीने कार्यवाही करावी. अधिक माहितीसाठी प्रादेशिक कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग भवन, विश्रामबाग, सांगली येथे संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.